पूर्व युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारत सरकार मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं, भारत सरकारनं म्हटलं आहे.
"तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे भारतीय पथक पाहत आहे. यावेळी हे काम सोपं नाही. कारण मार्ग हे कायम खुले नसतात," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बुधवारी माहिती देताना सांगितलं.
सरकारच्या अंदाजानुसार जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात देण्यात आलेल्या सूचनांनंतर आतापर्यंत 17 हजार भारतीय नागरिक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत.
"भारतीय नागरिकांना सीमा पार करता यावी यासाठी कीव्हमध्ये भारतीय दूतावासाला एक तात्पुरतं कार्यालय सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाचं एक पथक त्यासाठी त्याठिकाणी उपस्थित आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
"ज्या लोकांचे भारतीय पासपोर्ट हरवले आहेत, त्यांना इमर्जन्सी सर्टिफिकेट देण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळं अनेक भारतीय विद्यार्थ्यांची मदत होईल," असं बागची म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलणार आहेत का? असं बागची यांना विचारण्यात आलं. त्यावर 'मोदी अनेक देशाच्या नेत्यांशी बोलत आहेत' असं ते म्हणाले.
'ते एखाद्या नेत्याशी बोलतील तेव्हा आम्ही सांगू आधीच तसं सांगता येणार नाही', असंही ते म्हणाले.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बुधवारी एक आणखी विमान दिल्लीला पोहोचलं. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देशात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचं विमानतळावर स्वागत केलं.