'युक्रेनमधून 20 हजार भारतीयांना सुरक्षित बाहेर काढलं'
संयुक्त राष्ट्रातील भाराताचे राजदूत टीएस तिरुमूर्तींनी सुरक्षा परिषदेत सांगितलं की, भारतानं युक्रेनमधून आतापर्यंत 20 हजार भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवलंय.
याचसोबत, भारतानं युद्धग्रस्त देशातून निर्दोष लोकांना आणि भारतीय नागरिकांना सुरक्षित रस्ता देण्याची मागणीही केलीय.
"भारतानं रशिया आणि युक्रेनला सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडोअर बनवण्यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, तरीही अद्याप कॉरिडोअर बनवण्यात आलं नाही. त्यामुळे काळजी वाटते," असंही तिरुमूर्ती म्हणाले.
मानवीय कारवाई तटस्थता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य या सिद्धांतांच्या दिशेनं असायला हवी, असंही ते म्हणाले.
"आम्ही त्या देशांच्या नागरिकांचीही मदत केली, ज्यांनी आमच्याकडे मदत मागितली. येत्या दिवसात लोकांना बाहेर काढणं आम्ही सुरूच ठेवू. 80 हून अधिक विमानं लोकांना घरात पोहोचवण्यासाठी युक्रेननजिकच्या देशांमधून आतापर्यंत उडाली आहेत," असं तिरुमूर्तींनी सांगितलं.