You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मला माझा CV बोटॉक्स करावा लागला'; AI च्या काळात महिलांसाठी नोकरी मिळवणं अवघड झालंय का?
- Author, मेघन ओवेन
- Role, लंडन 'वर्क अँड मनी' प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) नोकऱ्यांवर गदा येईल की काय, अशी धास्ती आज जगभरातल्या लाखो नोकरदारांना वाटत आहे.
महिलांसाठी तर आणखीच आव्हानाची स्थिती निर्माण झालीय.
52 वर्षांच्या स्टेसी डुगुइड यांनी फॅशनच्या क्षेत्रात अनेक दशकं काम पाहिलं आहे. त्यांनी मोठमोठ्या कॉर्पोरेट पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या असून काही काळ त्यांनी फ्रीलान्सर म्हणून कामही केलं आहे. त्या सध्या उत्तर लंडनमध्ये राहतात.
यानंतर त्यांनी ठरवलं की, आता एक शेवटची नोकरी शोधायची. मग पुढचे सलग 16 महिने त्यांनी कित्येक ठिकाणी आपले सीव्ही पाठवले. पण समोरून फक्त मोजकेच कॉम्प्युटर-जनरेटेड मेसेज आले.
नवल म्हणजे याआधी नोकरी मिळवताना त्यांना इतका त्रास कधीच झाला नव्हता.
या सगळ्यामुळे स्टेसी यांना एकटं पडल्यासारखं आणि खजील झाल्यासारखं वाटू लागलं. आपल्यातच काहीतरी दोष आहे की काय, अशी शंका त्यांच्या मनात घर करू लागली.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत विचारलं की, त्यांच्याच वयाच्या इतर महिलाही अशाच प्रसंगातून किंवा अनुभवातून जात आहेत का?
या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो महिलांनी कमेंट करत सांगितलं की, त्यासुद्धा अगदी याच अडचणींचा सामना करत आहेत.
स्टेसी यांच्या मते, AI वर चालणाऱ्या या भरती प्रक्रियांमुळे हा प्रश्न आणखी बिकट होऊ शकतो.
त्यांनी स्वतःच्या सीव्हीमधून वयाचा उल्लेख आणि प्रदीर्घ अनुभवाचे तपशील वगळून टाकले. याला त्या सीव्हीचे "बोटॉक्स करणे" असं म्हणतात.
स्टेसी यांच्या मते, "AI हा आपल्या समाजाचा खरा आरसा आहे. आपल्या मनातील भेदभावपूर्ण विचारच त्याच्यातून झळकतात. हा त्रास फक्त स्त्रियांनाच होतो असा माझा दावा नाही. मला कित्येक पुरुषांनीही मेसेज करून आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. पण माझा आक्षेप वयावरून होणाऱ्या भेदभावावर आहे."
दांडगा अनुभव असूनही सततच्या नकाराने मोठा धक्का
बीबीसीने यानंतर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या 40 ते 65 वयोगटातील 60 हून अधिक महिलांशी संवाद साधला. या सर्व महिला गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
यांपैकी बहुतांश महिलांनी वरिष्ठ पदांवर कित्येक दशके काम केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी असंख्य सीव्ही पाठवले परंतु बदल्यात एकतर ऑटोमेटेड नकाराचे मेसेज मिळाले किंवा किंवा साधे उत्तरही आले नाही.
स्टेसीसारखंच कित्येक महिलांचं असं म्हणणं आहे की, AI वर चालणाऱ्या या भरती प्रक्रियांमुळे ही अडचण निर्माण होत आहे.
49 वर्षांच्या कोयली जलुका यांनी मॅन्युफॅक्चरिंग, कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या पदांवर काम पाहिलं आहे.
त्या सांगतात, "माझ्यावर अशी वेळ याआधी कधीच आली नव्हती. मागच्या 10 ते 12 वर्षांत कंपन्या स्वतः मला शोधत यायच्या आणि चांगल्या ऑफर्स द्यायच्या. पण आज मला स्वतःहून कामाच्या शोधात फिरावं लागतंय आणि सातत्याने नकाराचाच सामना करावा लागत आहे."
9 महिन्यांपूर्वी त्यांच्या हातची नोकरी सुटली. त्यानंतर त्यांनी तब्बल 442 जागांवर नोकरीसाठी प्रयत्न केले, पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत ठिकाणांवरूनच त्यांना उत्तर आले.
कधी कधी तर 'तुम्ही या कामासाठी खूप सिनियर आहात' अशी कारणं पुढे करण्यात आली. 'तुमचं वय जास्त झालंय' हे सांगण्याचाच हा दुसरा मार्ग आहे, असं त्या मानतात.
20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि दोन-दोन डिग्री असूनही आपला आत्मविश्वास पुरता ढासळला आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
त्यांच्या मते, मर्यादित बजेट, AI-आधारित तपासणी आणि भरती प्रक्रियेचे दिवसेंदिवस किचकट होणारे नियम, या सगळ्यांमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
त्या सांगतात, "आम्ही सीव्हीमधून सुरुवातीची 10 वर्षं कामाचा अनुभव वगळून टाकावा, असा सल्ला आमच्यातल्या कित्येकींना करिअर मार्गदर्शन देणाऱ्यांनी दिला आहे. आम्ही खूप प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहोत असा समज होऊ नये, यासाठी हा खटाटोप करावा लागत आहे."
'बेरोजगारी भत्त्यावर दिवस काढतेय'
52 वर्षांच्या ॲना काउई यांनी जाहिरात जगतात तब्बल 30 वर्षं काम केलंय. पण तरीही त्या मागच्या जवळपास 4 वर्षांपासून बेरोजगार आहेत.
त्यांनी एवढ्या ठिकाणी सीव्ही पाठवले आहेत की आता त्याचा हिशोब ठेवणंही अशक्य झालंय. हाताला काम नाही, अशी बिकट परिस्थिती त्यांनी आयुष्यात आधी कधीच पाहिली नव्हती.
त्यांनी अनेक नामांकित कंपन्यांसाठी काम केलं आहे. इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या प्रतिष्ठित अशा 'बॅटरसी पॉवर स्टेशन' प्रकल्पाच्या उभारणीत आणि तो सुरू करण्यातही मोलाची भूमिका बजावली होती.
"सध्या माझा उदरनिर्वाह सरकारकडून मिळणाऱ्या बेकारी भत्त्यावरच चालतोय," असं त्या सांगतात.
ॲना यांनी आपला मोकळा वेळ स्थानिक उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समाजकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
कोणालाही प्रत्यक्ष भेटून संवाद साधल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो, असा त्यांचा अनुभव आहे.
त्या सांगतात, "यामुळे लोक तुम्हाला फक्त कागदावरचा एखादा अर्जदार म्हणून नाही तर जिवंत माणूस म्हणून ओळखतात."
'याचा मोठा फटका बसू शकतो'
एखाद्या उमेदवाराची निवड करण्यात किंवा त्याला थेट नाकारण्यात AI टूल्सचा हात होता की नाही हे शोधून काढणे बऱ्याच प्रकरणांमध्ये कठीण असते.
याचे कारण म्हणजे कंपन्या सहसा आपल्या नोकरभरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील जाहीर करत नाहीत. तरीही AI प्रणालींमुळे मध्यमवयीन महिलांचे मोठे नुकसान होऊ शकते अशी भीती मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.
आर्थिक आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या 'सिटी ऑफ लंडन विमेन पिव्होटिंग टू डिजिटल टास्कफोर्स'नेही याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
टास्कफोर्सच्या अध्यक्षा कॅरोलिन हेन्स यांनी सांगितले की, नोकरीचे अर्ज आणि सीव्ही तपासण्यासाठी वापरली जाणारी AI प्रणाली अनेक अनुभवी महिलांचे खरे कर्तृत्व आणि कौशल्य ओळखण्यात अपयशी ठरत असल्याचं त्यांच्या संशोधनातून समोर आलं आहे. भरतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात वापरले जाणारे AI अशा असंख्य महिलांच्या कौशल्यांकडे दुर्लक्ष करत आहे, ज्या कामात अत्यंत प्रभावी ठरू शकतात आणि देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देऊ शकतात."
उदाहरणावरून समजून घ्यायचं तर, मुलांच्या देखभालीसाठी ज्या महिलांना कामातून ब्रेक घ्यावा लागला, त्यांच्या सीव्हीमध्ये नोकरीचा खंड दिसतो. बऱ्याच AI सिस्टीम्स या गॅपला चुकीच्या किंवा नकारात्मक दृष्टीने पाहतात.
मोठ्या प्रमाणावर विचार केला तर 2035 पर्यंत AI आणि ऑटोमेशनमुळे लाखो महिलांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज या टास्कफोर्सने वर्तवला आहे.
कर्मचाऱ्यांना नव्याने ट्रेनिंग देण्यासाठी जर वेळेत पैसा गुंतवला नाही तर लोकांना कामावरून काढून टाकण्याच्या भरपाईपोटीच कंपन्यांचे 75 कोटी पाउंड्सहून (सुमारे 8,000 कोटी रुपये) अधिक पैसे वाया जातील, असं टास्कफोर्सचं म्हणणं आहे.
डिजिटल टास्कफोर्सने केलेल्या ताज्या सर्व्हेत 1,000 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. यातल्या तब्बल 68 टक्के महिलांच्या मते, नवीन डिजिटल कौशल्ये शिकण्यासाठी किंवा डिजिटल क्षेत्रातील भूमिकांमध्ये जाण्याची त्यांच्या कंपन्यांनी कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही.
कॅरोलिन हेन्स म्हणाल्या, "जेव्हा देशाला आर्थिक विकासाची नितांत गरज आहे तेव्हा आपण उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनाचा वापर केला पाहिजे."
"मध्यम पातळीचा अनुभव असणाऱ्या महिला हेसुद्धा एक मोठी ताकद आहेत जर त्या नोकरीच्या बाजारातून अशा प्रकारे बाहेर फेकल्या गेल्या तर याचे फार मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात."
बीबीसीला अशीही माहिती मिळाली आहे की, भरती प्रक्रियेत पक्षपाताची शक्यता लक्षात घेऊन लंडनच्या काही कंपन्यांनी AI टूल्सचा वापर करणं बंद केलं आहे.
AI कायदातज्ज्ञ आणि 'बोन्साय AI अँड लीगल कन्सल्टन्सी'च्या संस्थापिका लॉरा होल्डन यांचं म्हणणं आहे की, हे टूल्स नेमके कसे चालतात याची बऱ्याच कंपन्यांना पूर्ण कल्पनाच नसते.
त्यांच्या मते, यामुळे गंभीर नुकसान होण्याची मोठी भीती निर्माण होऊ शकते.
होल्डन यांच्या मते, AI खरोखरच भेदभाव करतंय की नाही हे शोधून काढणं फार अवघड काम आहे. कारण जगभरात असे कोणतेही कडक कायदे नाहीत जे AI तयार करणाऱ्या कंपन्यांवर त्यांच्या टूल्सची कार्यप्रणाली जाहीर करण्याचे बंधन घालू शकतील.
सीव्ही तपासणाऱ्या सॉफ्टवेअरचं आणि AI द्वारे घेतल्या जाणाऱ्या इंटरव्ह्यूचं उदाहरण त्यांनी दिलं. त्यांच्या मते, नेमक्या याच टप्प्यांवर गैरसमज किंवा भेदभावाची शक्यता निर्माण होऊ शकते.
त्यांनी सांगितलं की, एक टूल तर सीव्हीला थेट A ते D असे ग्रेड्स देतं. त्यामुळे नोकरभरती करणाऱ्यांचं लक्ष फक्त जास्त रँक असलेल्या उमेदवारांवरच केंद्रित होतं आणि त्यांनाच आधी पसंती दिली जाते.
काही इतर टूल्स 7 वर्षांच्या करिअर ब्रेकसारख्या गोष्टींना "लक्ष देण्याजोगी बाब" मानून चिन्हांकित करतात. यामुळे नोकरभरतीच्या निर्णयांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. AI प्रणाली तयार करणाऱ्या कंपन्या आमचे उत्पादन सुरक्षित असून यात कोणताही भेदभाव होत नाही, असा दावा फार पटकन करतात, असं होल्डन सांगतात.
पण प्रत्यक्षात या टूल्सचा वापर अशा पद्धतीने केला जातो की, कंपन्या केवळ AI च्या स्कोअरवर विसंबून राहून अनेक उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळू लागतात.
कंपन्यांचा दावा असतो की, ही टूल्स केवळ निर्णय घेण्यास मदत करतात. पण प्रत्यक्षात हे टूल्स बऱ्याचदा "स्वतःच थेट निर्णय घेणाऱ्या सिस्टीमप्रमाणे" चालतात, असं होल्डन सांगतात.
नोकरभरतीमध्ये कोणत्याही AI टूलचा वापर करण्याआधी त्यांची सक्तीने चाचणी व्हावी आणि त्यासाठी कठोर नियमावली असावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
त्यांच्या मते, सध्या अस्तित्वात असलेले कायदे हे AI चे स्वरूप डोळ्यांसमोर ठेवून बनवलेलेच नाहीत.
कॅरिअर गॅप असलेल्या महिलांसाठी अडथळा ठरणारी AI टूल्स
केंब्रिज विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक डॉ. एलेनॉर ड्रेज यांच्या मते, नोकरभरती प्रक्रियेत AI मुळे महिलांचे नुकसान होत असल्याबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंता 'पूर्णपणे रास्त' आहेत.
कामातून ब्रेक घेऊन पुन्हा नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची खरी गुणवत्ता आणि कौशल्ये मशीनपेक्षा प्रत्यक्ष माणूस अधिक चांगल्या रीतीने पारखू शकतो, असं त्या सांगतात.
उदाहरणावरून सांगायचे तर, मॅटर्निटी लीव्ह संपवून कामावर परतणाऱ्या महिलांमध्ये अशी अनेक कौशल्ये असतात जी इतर कामांसाठीही उपयुक्त ठरू शकतात. पण AI अशा क्षमतांकडे दुर्लक्ष करू शकते असं ड्रेज स्पष्ट करतात.
AI वर चालणारी भरती टूल्स स्वतःच भेदभाव करत आहेत हे सिद्ध करणं खूप अवघड असल्याचं त्यांनी सांगितलं.
पण त्यांच्या मते, ही यंत्रणा ज्या तर्क आणि कार्यपद्धतीवर काम करते, ती पद्धतच अगदी चुकीची आहे.
एखादा माणूस समोरच्या उमेदवाराची खरी गुणवत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्त्व ज्या बारकाईने ओळखू शकतो, तशी पारख AI कधीच करू शकत नाही, असे त्या स्पष्ट करतात.
ही टूल्स प्रत्यक्षात कशी चालतात हे नोकरभरती करणाऱ्या अनेकांना स्वतःलाच नीट माहिती नसतं, असं ही त्यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, कंपन्यांनी AI चा उपयोग स्वतःची भरती पद्धत कितपत योग्य आहे हे तपासण्यासाठी करायला हवा.
नोकरीच्या स्पर्धेत आधीच मागे पडलेल्या किंवा संवेदनशील घटकांतील उमेदवारांना पारखण्यासाठी AI चा वापर करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. यामध्ये मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कामावर परतणाऱ्या जास्त वयाच्या महिला आणि करिअरमध्ये दीर्घ गॅप असलेल्या लोकांचा समावेश आहे.
डॉ. ड्रेज यांच्या मते या टूल्सचे काही चांगले पैलूही नक्कीच आहेत.
जसे की, कंपनीत आधीपासून उत्तम काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसारखीच कौशल्ये आणि गुण असणारे उमेदवार शोधणे यामुळे भरती अधिकाऱ्यांना सोपे जाते.
पण तरीही ही साधने नोकरी शोधणाऱ्यांच्या भल्याचा फारसा विचार करत नाहीत, असं त्या स्पष्ट करतात.
त्या सांगतात, "बऱ्याचदा ही सिस्टीम नोकरी हवी असणाऱ्या लोकांच्या बाजूने उभी राहत नाही."
'कठोर चाचणीतून पार पडलेली'
(या लेखात ज्यांच्या अनुभवांचा संदर्भ दिला आहे, त्यांच्या तक्रारी या मुख्यत्वे AI भरती पद्धतींच्या वाढत्या वापराशी संबंधित आहेत. हे आक्षेप केवळ एका विशिष्ट कंपनीपुरते किंवा सेवा देणाऱ्या संस्थेपुरते मर्यादित नाहीत.)
एचआर क्षेत्रासाठी AI सॉफ्टवेअर बनवणाऱ्या 'वर्कडे' या कंपनीविरोधात सध्या न्यायालयात एक खटला चालवला जात आहे.
कंपनीवर कॅलिफोर्नियाच्या कायद्याचे अनेकवेळा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आरोप असा आहे की, कंपनीच्या टूल्सनी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये पक्षपाती निकष लावून नोकरीसाठी आलेल्या अर्जदारांना फेटाळून लावले.
हा खटला अजून कोर्टात चालू असून, या वर्षाच्या शेवटपर्यंत यावर निकाल येणे अपेक्षित आहे.
बीबीसीने याबाबत विचारणा केली असता, कोर्टातील हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचा दावा वर्कडेने केला.
कोणाला नोकरी द्यायची याचा अंतिम निर्णय ही टूल्स घेत नाहीत, असेही कंपनीचे म्हणणे आहे.
कामावर नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठीच ही टूल्स तयार करण्यात आली आहेत, असा वर्कडेचा दावा आहे. उमेदवारांचे कौशल्य आणि अनुभव पाहून, कंपनीच्या गरजांशी तंतोतंत जुळणाऱ्या योग्य उमेदवारांची निवड करण्यात ही सिस्टीम मदत करते.
ही साधने माणसाच्या निर्णयाला पर्याय नसून केवळ त्या निर्णयाला अधिक बळ देण्याचे काम करतात, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
आमची AI प्रणाली "रेस्पॉन्सिबल AI" या तत्त्वावर अत्यंत काटेकोरपणे तपासली जाते, असं वर्कडेने सांगितले.
उमेदवाराचे वय किंवा लिंग पाहून आमची यंत्रणा काम करत नाही, असा कंपनीचा दावा आहे.
तसेच AI चा योग्य आणि जबाबदार वापर केल्यास हजारो अर्जांमध्ये हुशार आणि पात्र उमेदवार दुर्लक्षित राहणार नाहीत असंही असेही वर्कडेने नमूद केलं.
मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांनीही भरती प्रक्रियेतील वाढत्या AI च्या वापरावर नुकतीच चिंता बोलून दाखवली होती.
AI मुळे "भरती पद्धत अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झालेली नाही," असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते.
शासकीय प्रवक्त्याने सांगितलं, "मोठ्या संख्येने येणारे अर्ज हाताळण्यासाठी आणि प्रशासकीय भार कमी करण्यासाठी AI कंपन्यांना मदत करू शकते."
ते पुढे म्हणाले, "परंतु नोकरभरती प्रक्रिया ही निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ राहणे अत्यंत आवश्यक आहे."
प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, "समानता आणि डेटा सुरक्षेशी संबंधित सध्याचे कायदे आधीपासूनच AI प्रणालींवर लागू आहेत. जिथे अतिरिक्त सुरक्षेची गरज भासेल, तिथे आम्ही आवश्यक पावले नक्कीच उचलू."
लंडनचे महापौर सर सादिक खान यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, AI स्वतःसोबत संधी आणि आव्हाने या दोन्ही गोष्टी घेऊन येते.
ते पुढे म्हणाले की, हा मुद्दा यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण AI मुळे ज्या क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्या क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.
प्रवक्त्यांनी नमूद केले की, लंडनच्या महापौरांनी 'AI अँड जॉब्स टास्कफोर्स'ने सुचवलेल्या उपायांचे स्वागत केले आहे.
कंपन्यांनी AI चा वापर काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करावा आणि या बदलांच्या काळात कामगारांना आधार मिळावा, हाच या शिफारशींमागचा हेतू आहे.
दुसरीकडे स्टेसी यांनी महिलांना मदत करण्यासाठी एक कम्युनिटी चॅट ग्रुप आणि एक विशेष व्यासपीठ सुरू केले आहे.
याचा उद्देश महिलांना आपण एकट्या नाही आहोत, याची जाणीव करून देणे हा आहे. सोबतच कंपन्यांना या अडचणी समजून घेण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास मदत करणे, हाही यामागील हेतू आहे.
स्टेसी म्हणतात, "एक समूह म्हणून आमचा आवाज ऐकला जावा आणि आमची दखल घेतली जावी, एवढीच माझी इच्छा आहे. वय आणि लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव कायमचा इतिहासजमा व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे. कारण जर आपलं नशीब चांगलं असेल, तर एक दिवस आपण सगळेच म्हातारे होणार आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)