किराणा सामान आणायला गेली आणि अपहरण झालं; 24 वर्षांनी सुटका झाल्यावर सांगितली थरारक कहाणी

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

जपानच्या सादो बेटावर ऑगस्टची ती एक शांत, रम्य संध्याकाळ होती. पण याच संध्याकाळी 19 वर्षांच्या हितोमी सोगाचे आयुष्य कायमचे बदलणार होते.

आईसोबत किराणा सामान आणून दोघी घराच्या दिशेने पायी परत येत होत्या. तेवढ्यात मागून तीन माणसं अचानक समोर आली आणि त्यांनी मायलेकींना उचलून नेलं.

ती घटना आठवत सोगा म्हणतात, "आमच्या चेहऱ्याला काहीतरी लावून, डोक्यावर मोठी पिशवी टाकली होती."

पुढचे काही दिवस कसे गेले, हेच त्यांना समजत नव्हते. किनाऱ्यावरून त्यांना आधी एका सुसाट नावेमध्ये आणि तिथून पुढे बहुधा एका मोठ्या जहाजावर नेण्यात आले.

सोगा सांगतात की, त्यांना आपल्या आईशी बोलण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर आईचा तोच मायाळू, हसरा आणि अतोनात प्रेम करणारा चेहरा आजही तसाच उभा राहतो.

त्या सांगतात, "शेवटच्या क्षणीही मी आईशी काहीच बोलू शकले नाही, ही खंत मनात कायम राहिली."

काही दिवस उलटल्यावर शेवटी त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढण्यात आली. आजूबाजूला नजर फिरवताच त्यांच्या मनात एकदम चमकून गेले, "हे ठिकाण जपान तर मुळीच नाही."

सोगा यांना थेट उत्तर कोरियात नेण्यात आले होते. 1970 आणि 1980 च्या काळात चालवल्या गेलेल्या एका गुप्त आणि सरकारी पाठिंबा असलेल्या अपहरण मोहिमेची त्या शिकार झाल्या होत्या.

त्यानंतरची तब्बल 24 वर्षे त्यांना त्याच देशात काढावी लागली.

दोन वर्षे सैन्याच्या बराकीमध्ये डांबून ठेवले

यामागे एक असाही थरारक सिद्धांत सांगितला जातो की, उत्तर कोरियन अधिकाऱ्यांचा खरा हेतू या अपहरण केलेल्या निष्पाप जपानी लोकांना अक्षरशः "जिवंत पाठ्यपुस्तकं" म्हणून वापरण्याचा होता.

उत्तर कोरियाच्या हेरांना आणि गुप्तहेरांना जपानी भाषा, तिथली खास देहबोली आणि संस्कृतीचे बारकावे अगदी अस्सल जपानी माणसासारखेच शिकता यावेत जेणेकरून नंतर त्यांना सहजपणे जपानमध्ये घुसखोरी करून हेरगिरी करता येईल हाच यामागचा कट होता.

1977 ते 1983 या काळात अपहरण झालेल्या अशा किमान 17 जपानी नागरिकांची सरकारने ओळख पटवली आहे. पण खरी संख्या यापेक्षा नक्कीच जास्त असू शकते.

सोगा म्हणतात, "मला आजही समजत नाही. त्यांनी ठरवून माझे अपहरण केले होते, की ती फक्त एक अचानक घडलेली घटना होती."

सुरुवातीची दोन वर्षे त्यांना लष्कराच्या बराकीत डांबून ठेवले गेले.

आई कुठे आहे याचा काहीच पत्ता नव्हता तरीही त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्याला का पकडून आणले असा जाब कधी विचारला नाही. कारण आपल्याला कोणी खरे सांगणार नाही, हे सोगा यांना कळून चुकले होते.

त्या सांगतात, "मी बराकीच्या बाहेर येऊन एकटक आभाळाकडे पाहत राहायचे. त्या चंद्र-ताऱ्यांकडे बघताना जपानमधल्या घराची, आई-वडिलांची आठवण येऊन डोळ्यांतून अश्रू वाहायचे आणि वाटायचे की, मी त्यांना पुन्हा कधी डोळे भरून पाहू शकेन का?"

मनातली भीती आणि तो भयानक एकाकीपणा सोसत असतानाही एका दिवशी आपली यातून सुटका होईल हा विश्वास त्यांनी सोडला नाही.

त्या सांगतात, "मी हीच एक गोष्ट काळजाशी घट्ट धरून ठेवली होती. हे वाईट दिवस कधीतरी संपतील अशी मला पक्की खात्री होती आणि तो आशेचा किरण माझ्या मनातून कधीही नाहीसा झाला नाही."

अमेरिकन सैनिकाशी जबरदस्तीने लग्न

शेवटी 1980 च्या सुमारास सोगा यांना लष्कराच्या त्या बंदिस्त बराकीतून बाहेर पडण्याची मोकळीक मिळाली.

पण तिथे त्यांना एक धक्कादायक गोष्ट सांगितली गेली. ज्या व्यक्तीला त्यांनी आयुष्यात कधी पाहिलेही नव्हते त्याच्याशी त्यांचे लग्न लावून दिले जाणार होते. ते होते चार्ल्स जेनकिन्स. 1965 मध्ये अमेरिकन लष्करातून पळ काढून उत्तर कोरियात आलेले एक सैनिक.

जेनकिन्स यांनी सीमेवरील निमलष्करी भाग ओलांडून उत्तर कोरियात प्रवेश केला होता.

आपल्याला व्हिएतनामच्या युद्धाच्या आगीत ढकलले जाणार आहे अशी भीती त्यांच्या मनात पक्की बसली होती. त्यांना वाटले होते की, उत्तर कोरियासमोर शरण गेले तर पुढे-मागे अमेरिकेत परत जायचा मार्ग मोकळा होईल.

उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीने याचा वापर स्वतःच्या जोरदार प्रचारासाठी केला. ज्या जपान आणि अमेरिकेला उत्तर कोरिया आपले कट्टर शत्रू मानत आला होता, त्याच दोन देशांतील माणसांना त्यांनी एक विवाहित जोडपे म्हणून जगासमोर आणून उभे केले होते.

सोगा सांगतात, "आम्ही पहिल्यांदा भेटलो तो दिवस मला आजही आठवतो. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि मी प्रचंड चिंतेत व घाबरलेली होते."

या लग्नात त्यांचा स्वतःचा कसलाही होकार नसला, तरी पुढे हळूहळू त्या जेनकिन्सची जीवापाड काळजी घेऊ लागल्या. त्यांना 2 मुली झाल्या. जेनकिन्स मुलींसाठी स्वतःच्या हाताने लाकडी खेळणी आणि फर्निचरच्या लहान-सहान वस्तू तयार करायचा.

या दिवसांची आठवण काढताना सोगा सांगतात, "हळूहळू हे सगळे आयुष्य अगदी सहज आणि स्वाभाविक वाटू लागले होते. आमच्या घरात लेकींचा जन्म झाला, तेच माझ्या आयुष्यातले सर्वात सुखाचे क्षण होते."

"तो मुलींशी खूप मायेने, प्रेमाने वागायचा. त्यांची अतोनात काळजी घ्यायचा. त्याची हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडायची."

त्या दोघांकडेही पगार देणारी कुठलीही नियमित नोकरी नव्हती. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीच्या कडक पहाऱ्यात आणि सततच्या पाळतीखाली त्यांचे जगणे चालू होते. त्यांनी कधी काय करावे, दिवसभर वेळ कसा घालवावा, यावरही तिथल्या सरकारने असंख्य कडक निर्बंध घातले होते.

सोगा सांगतात की, त्या बऱ्याच वेळेस भाजीपाला पिकवण्यात स्वतःला गुंतवून ठेवायच्या. या म्हणतात, "मनोरंजनाची कसलीच साधने नव्हती..ना गाण्यांचे कार्यक्रम, ना चित्रपट. विरंगुळ्यासाठी काहीच नव्हते."

प्रत्येक दिवस भीती आणि चिंतेच्या छायेतच जायचा. पण माझे कुटुंब माझ्या पाठीशी होते त्यामुळे मला त्यातून थोडाफार मानसिक आधार आणि दिलासा मिळायचा."

पण 2002 च्या वर्षात त्यांच्या आयुष्याला अचानक एक अनपेक्षित कलाटणी मिळाली. याच काळात सोगा यांच्या अपहरणामागचे धक्कादायक सत्य जगासमोर उघड झाले.

जपान आणि उत्तर कोरिया यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाची शिखर बैठक पार पडली.

या चर्चेदरम्यान उत्तर कोरियाचे तत्कालीन हुकूमशहा किम जोंग-इल यांनी एक मोठी कबुली दिली. जपानने उपस्थित केलेल्या संशयित 17 नागरिकांच्या यादीतील 13 जणांना उत्तर कोरियानेच उचलून आणले होते, हे त्यांनी उघडपणे मान्य केले.

या अपहरण केलेल्या नागरिकांपैकी फक्त 5 जणच जिवंत उरल्याचे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एवढेच नाही, तर सोगा यांची आई मियोशी कधी उत्तर कोरियात पोहोचल्या होत्या की नाही, याबाबतही त्यांनी काहीच स्पष्ट केले नाही.

त्यानंतर काही दिवसांतच आपल्याला काही दिवसांसाठी जपानला परत जाण्याची मोकळीक मिळणार आहे, ही बातमी सोगा यांना समजली.

त्या आठवण सांगताना म्हणतात, "माझ्या मनात केवळ एकच ओढ लागली होती की कधी एकदा जपानला पोहोचून आपल्या माणसांना भेटतेय. आणि कुठेतरी एक आशा होती की, कदाचित या निमित्ताने आईला पुन्हा एकदा डोळे भरून पाहता येईल."

कुटुंबाच्या भेटीसाठी मायदेशी जपानमध्ये परतल्या

सोगा यांनी उत्तर कोरियामध्ये आपले पती आणि मुलींचा निरोप घेतला. त्यानंतर त्या जपानच्या विमानाकडे निघाल्या. त्या आपल्या बहिणीला आणि वडिलांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाने तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या परतीची वाट पाहिली होती. किंबहुना सोगा जिवंत आहेत की नाही, हेसुद्धा त्यांच्या घरच्यांना ठाऊक नव्हते.

सोगा सांगतात, "जेव्हा आम्ही पुन्हा एकमेकांना भेटलो आणि एकमेकांना मिठी मारली, तेव्हा आम्ही सर्वजण फक्त रडतच राहिलो."

सोगा यांनी जपानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना आपल्या पती आणि मुलींना पुन्हा भेटण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला.

आपण जर जपानला गेलो, तर अमेरिकन लष्कर आपल्याला अटक करू शकते अशी भीती त्यांचे पती चार्ल्स यांच्या मनात होती.

अखेर चर्चा आणि तडजोडीनंतर हा प्रश्न सुटला. चार्ल्स यांनी लष्करामधून पळून गेल्याचा आणि शत्रूला मदत केल्याचा गुन्हा कबूल केला.

त्यांना 30 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु त्यांपैकी त्यांनी 25 दिवसांची शिक्षा पूर्ण केली.

यानंतर 2004 मध्ये संपूर्ण कुटुंबाला सादो बेटावर कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळाली.

सोगा सांगतात, "माझ्या मुली याआधी कधीही सादो बेटावर गेल्या नव्हत्या. परंतु, त्यांना ठाऊक होते की हे त्यांच्या आईचे मूळ गाव आहे. त्यांना ही जागा खूप आवडली."

अपहरण झालेल्या नागरिकांना सोडवण्याच्या मोहिमेत झोकून दिले.

2017 मध्ये जेनकिन्स यांचे जपानमध्ये निधन झाले. त्यानंतर सोगा यांनी जपानमधून अपहरण करून नेण्यात आलेल्या सर्व नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

सोगा सांगतात की, उत्तर कोरियामध्ये अजूनही अडकलेल्या लोकांसाठी "प्रत्येक दिवस अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे."

पण अपहरण झालेल्या त्या साऱ्यांमध्ये एक अशी व्यक्ती आहे जिच्या परतीची आशा सोगा यांनी आजही काळजाशी घट्ट धरून ठेवली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांची स्वतःची आई, मियोशी.

आपला हा अढळ निर्धार आई जिथे कुठे असेल तिथे तिला नक्कीच जगण्याची नवी ताकद आणि उमेद देईल असा सोगा यांना पक्का विश्वास आहे.

आईच्या आठवणीत त्या म्हणतात, "मला वाटते माझी आई आज म्हणत असेल, 'माझी लेक अजूनही माझ्यासाठी लढते आहे, तिने हार मानलेली नाही. मग मी तरी कशी हार मानू? मीही शेवटपर्यंत लढत राहीन."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)