पेलेट गन प्रकरणात साहिल लोचव यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल; राहुल गांधींनी केला 'हा' आरोप

फोटो स्रोत, ANI
दिल्ली पोलिसांनी साहिल लोचव यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करत कथित पेलेट गन गोळीबार प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान साहिल लोचव जखमी झाले होते.
एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, "हे न्यायाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आम्ही सकाळी साडेअकरा वाजता आलो होतो आणि संध्याकाळी साडेसहा वाजता एफआयआर दाखल झाला. दिल्लीमध्ये अशी परिस्थिती असेल, तर गावांमध्ये काय होत असेल याची कल्पना करा. इथेही अखेर अमित शाह यांची परवानगी घ्यावी लागली."
दरम्यान, तक्रारदार साहिल लोचव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "कोणत्याही माध्यमांमध्ये बातमी न होता राहुल गांधी आणि त्यांची टीम सातत्याने माझी मदत करत होती. काल-परवा त्यांच्याशी बोलताना मी एफआयआर दाखल होत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी भेटूया आणि एफआयआर दाखल करून घेऊ, असं सांगितलं."
ते पुढे म्हणाले, "मी मनापासून त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला मदत केली. हा न्यायाचा विजय आहे आणि ही एफआयआर त्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे."
याआधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनाला बसले होते. साहिल लोचव यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती.
राहुल गांधी पोलीस ठाण्यात गेल्याच्या प्रकाराला भाजपने अराजकतेचं राजकारण म्हटलं होतं.
खासदार रवी शंकर प्रसाद म्हणाले, "ते कोणतीही परवानगी किंवा पूर्वसूचना न देता संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनास बसले आहेत. ज्या घटनेचा ते उल्लेख करत आहेत, त्याबाबत आधीच एफआयआर दाखल झाला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानेही एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे."
"राहुल गांधी, तुम्हाला कोणत्याही कायद्याचा आदर करायचा नाही का?", असा सवाल त्यांनी केला.
"वंदे मातरमबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस आता अडचणीत सापडली आहे, असा आमचा आरोप आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सध्या जे काही करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो."
"देशात असा संदेश गेला आहे की, 1937 मध्ये काँग्रेसवर मुस्लिमांच्या बाजूने भूमिका घेण्याचा दबाव होता, तसाच प्रकार आता 2026 मध्येही होत आहे."

फोटो स्रोत, ANI
नेमकं प्रकरण काय आहे?
साहिल लोचवने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करावा, अशी राहुल गांधींची मागणी आहे. याच मागणीसाठी ते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही संसद मार्ग पोलीस ठाण्यात आले आहेत. दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत.
"राहुल गांधी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत," असं काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, INCIndia
आपल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी राहुल गांधी करत आहेत. सध्या ते साहिल लोचव आणि काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांच्यासोबत डीसीपी कार्यालयात उपस्थित आहेत.
काँग्रेसनं गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पेलेट गन्सचा वापर करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसने 'एक्स'वर लिहिलं, "अमित शाह यांनी देशातील मुलांवर पेलेट गन चालवण्याचे आदेश दिले. यात साहिलच्या डोळ्याला पेलेट लागून गंभीर दुखापत झाली."
"साहिल आणि त्याची आई एफआयआर दाखल करण्यासाठी अनेकवेळा पोलिसांकडे गेले, पण पोलिसांनी त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहिल आणि त्याच्या आईसोबत पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती मागितली."
साहिलच्या तक्रारीवर पोलिसांनी तपास क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे एफआयआर दाखल झालेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
आरटीआयद्वारे काय माहिती समोर आली होती?
टीएमसीचे माजी खासदार साकेत गोखले यांनी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या वापराबाबत आरटीआयद्वारे माहिती मिळवली होती.
त्यात पेलेट गनमुळे जखमी झालेल्या लोकांची संख्या किमान 5 असल्याची माहिती समोर आल्याचं साकेत गोखले यांनी सांगितलं होतं.
"पण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त त्याच्या दुप्पट, म्हणजेच 10 आहे," असं त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
गोखले यांना मिळालेल्या माहितीनुसार, पेलेट गनने जखमी झालेल्या नऊ जणांना लेडी हार्डिंग रुग्णालयात आणि एकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीतील एम्स (AIIMS) आणि आरएमएल (RML) कडून माहितीासाठी गोखले अजूनही वाट पाहत आहेत.
"ही कसली लोकशाही आहे, जिथं पोलीस पेलेट गन वापरतात, त्याबद्दल खोटं बोलतात आणि चौकशी केल्यावर जखमींची संख्या सांगण्यास नकार देतात?", असं गोखले यांनी ही सर्व माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं.
"भारताच्या राजधानीत शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला आणि सरकार तसंच पोलीस अजूनही तपशील लपवत आहेत. मोदी सरकारनं पेलेट गनमुळं जखमी झालेल्या लोकांची निश्चित संख्या अद्याप का जाहीर केली नाही?" असंही त्यांनी पुढं लिहिलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
आंदोलन करताना राहुल गांधी यांनी 20 जुलै रोजी जंतर मंतरवर पेलेट गनचा वापर करण्यात आला होता असं म्हटलं.
राहुल गांधी यांनी यावेळी एका बॉक्समध्ये ठेवलेले कथित छर्रे दाखवले. ते छर्रे संबंधित तरुणाच्या शरीरातून काढण्यात आल्याचा दावा केला.
"त्यांच्या शरीरात 200 छर्रे आहेत तर तीन छर्रे डोळ्यात आहेत," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
दिल्लीतील एम्स आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटलचे रिपोर्ट त्यांनी दाखवले.
"या अहवालांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, त्यांच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत. डोळ्यात तीन छर्रे आहेत. त्या डोळ्याने त्यांना दिसणार नाही आणि त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ छर्रे अडकले आहेत, ते काढता येणार नाहीत," असंही त्यांनी म्हटलं.
दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, आम्ही पेलेट गनचा वापर केला नाही. पण जर तुम्ही केला नाही, तर कोणीतरी नक्कीच केला. कदाचित दुसऱ्या कोणीतरी त्यांच्यावर या पेलेट गनने गोळ्या झाडल्या असतील. जर दुसऱ्या कोणी त्या झाडल्या नसतील, तर कदाचित त्यांनी स्वतःवरच झाडल्या असतील. आम्हाला फक्त एफआयआर नोंदवला जावा असं वाटतं. जोपर्यंत एफआयआर नोंदवला जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























