एअर इंडियाचं विमान हवेत असताना अचानक 300 फूट खाली आलं; 'पायलट नशेत'? 5 महत्त्वाचे मुद्दे

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

गेल्या आठवड्यात एअर इंडियाचं विमान हवेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आल्याच्या घटनेनंतर त्या विमानाच्या वैमानिकांची चौकशी सुरू आहे.

माध्यमांमधील वृत्तांनुसार, अमली पदार्थांच्या दुसऱ्या चाचणीत (सेकंडरी ड्रग टेस्ट) या वैमानिकाची चाचणी 'पॉझिटिव्ह' आली आहे. हे विमान थायलंडमधील फुकेतमधून दिल्लीला जात होतं.

नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं की, 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) या प्रकरणाचा तपास करत आहे आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच ते यावर ठोसपणे भाष्य करतील.

राम मोहन नायडू यांनी पुढे असंही नमूद केलं की, जर या प्रकरणात अमली पदार्थांच्या सेवनाचा संबंध आढळला आणि विद्यमान नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं, तर कठोर कारवाई करण्यात येईल.

AAIB या घटनेशी संबंधित तांत्रिक, वैद्यकीय आणि मानवी घटकांशी निगडित सर्व संबंधित पुराव्यांची तपासणी करत आहे.

दरम्यान, मंगळवारी भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं फुकेत-दिल्ली विमानसेवेशी संबंधित घटनेबाबत एअर इंडियाचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांना बोलावले होते.

4 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमध्ये 20 प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले आहेत.

या एअरबस A320 विमानात 137 प्रवासी आणि आठ कर्मचारी होते.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, भारत सरकारने रविवारी जाहीर केलं की 'AI 2379' या विमान प्रवासाच्या मुख्य वैमानिकाची (पायलट-इन-कमांड) पुन्हा एकदा अमली पदार्थांची चाचणी केली जाईल. त्या वैमानिकाच्या सुरुवातीच्या चाचणीचा निकाल 'नॉन-निगेटिव्ह' आला होता. ही एक प्राथमिक आणि जलद चाचणी असते आणि तिचा निकाल अंतिम मानला जात नाही.

अशा गंभीर घटनांच्या चौकशीदरम्यान, मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या (सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्सेस) सेवनाबाबत चाचणी करणं, ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे.

सुरुवातीच्या चाचणीचा निकाल 'नॉन-नेगेटिव्ह' आल्यास, खात्री करण्यासाठी दुसरी चाचणी केली जाते. सूत्रांच्या हवाल्यानं अमेरिकन प्रसारमाध्यम असलेल्या 'ब्लूमबर्ग'नं असं वृत्त दिलं आहे की, दुसऱ्या चाचणीत संबंधित वैमानिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, "तपासाचे निष्कर्ष गोपनीय असल्याने त्यांनी ही माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. 'एअर इंडिया'च्या प्रवक्त्यांनी वैमानिकाच्या ड्रग टेस्टच्या निष्कर्षांवर भाष्य करण्यास नकार दिला. फ्रान्सची विमान अपघात तपास यंत्रणा आणि फ्रान्सस्थित एअरबसचे तांत्रिक तज्ज्ञही AAIB च्या तपासात मदत करत आहेत."

गेल्या वर्षी एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा झालेला भीषण अपघात आणि सुरक्षिततेशी संबंधित अनेक घटनांनंतर, भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या घटनेमुळे टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियासमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे.

31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या विमान कंपनीला सुमारे 2.3 अब्ज डॉलर्सचा विक्रमी तोटा झाला. तसेच, ही घटना विमान कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टेवोल्डे गेब्रेमारियम यांच्यासमोर असलेली आव्हानंही अधोरेखित करते.

1. ड्रग टेस्टचा निकाल 'पॉझिटिव्ह' आल्यास काय होतं?

भारताच्या विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाच्या नियमांनुसार, ज्या कर्मचाऱ्याची अमली पदार्थांची चाचणी पहिल्यांदाच 'पॉझिटिव्ह' येते, त्याला व्यसनमुक्ती उपचारांसाठी पाठवलं जातं.

अमली पदार्थांची चाचणी करण्यास नकार देण्याकडे DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) तितक्याच गांभीर्यानं पाहते, जितकं चाचणीचा निकाल 'पॉझिटिव्ह' आल्यास पाहिलं जातं. पहिल्यांदा नकार दिल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला ड्यूटीवरून दूर केलं जातं आणि त्याला 48 तासांच्या आत ड्रग टेस्ट क्लिअर करणं अनिवार्य असतं.

असं न केल्यास त्याचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केला जातो आणि संबंधित व्यक्तीला पुन्हा सेवेत रुजू होण्यापूर्वी अंमली पदार्थ व्यसनमुक्ती कार्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य असतं.

सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या पदावर परतण्यासाठी, कर्मचाऱ्याला पुन्हा चाचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यात त्याचा अहवाल 'निगेटिव्ह' (अंमली पदार्थांचं सेवन न केल्याचं सिद्ध करणारा) येणं आवश्यक असतं. दुसऱ्यांदा चाचणीचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्यास परवाना तीन वर्षांसाठी निलंबित केला जातो, तर तिसऱ्यांदा 'पॉझिटिव्ह' अहवाल आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जातो.

2. नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय सांगितलं?

नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी सांगितलं की, एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानाशी संबंधित घटनेवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यापूर्वी 'एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'च्या चौकशीचा अहवाल येण्याची वाट पाहिली जाईल.

नायडू यांनी पत्रकारांना सांगितलं की, एअर इंडियाचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांच्यासोबत मंत्रालयानं एक प्राथमिक बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश एअर इंडियाने संबंधित घटनेला कशा पद्धतीनं हाताळलं आणि सुरक्षा नियमावलीचं पालन करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या का, हे जाणून घेणं हा होता. विशेषतः वैमानिकांकडून नशिल्या पदार्थांच्या वापराबाबतच्या नियमांचं पालन झालंय की नाही, याबाबत ही बैठक झाली.

सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच, या बाबतीत विमान कंपन्या, नियामक संस्था किंवा इतर कोणत्याही संबंधित घटकाकडून कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

त्यांनी सांगितलं की, वैमानिकांकडून अमली पदार्थांच्या वापराबाबतच्या डीजीसीएच्या (DGCA) नियमांबाबत मंत्रालयानं अद्ययावत माहिती मागवली आहे आणि जर सध्याचे नियम अपुरे असल्याचं आढळलं, तर त्यात बदल करण्याचा विचार केला जाईल.

3. नियम काय आहेत?

विमान वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची 'सायकोअॅक्टिव्ह' (मानसिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या) पदार्थांच्या सेवनाबाबत तपासणी करण्याविषयीची 'नागरी उड्डाण महासंचालनालया'ची मार्गदर्शक तत्त्वे सप्टेंबर 2021 मध्ये जारी करण्यात आली होती आणि ती 31 जानेवारी 2022 पासून लागू झाली.

या नियमांचा मुख्य भर वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रक (एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स) यांच्यावर असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं संवेदनशील कामं करणाऱ्या इतर विमान वाहतूक कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतात. यामध्ये एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअर, सर्टिफायिंग स्टाफ, ट्रेनी पायलट आणि ट्रेनर यांचा समावेश आहे.

फ्लाईट क्रू आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सच असे कर्मचारी आहेत, ज्यांची दरवर्षी 10 टक्के रँडम पद्धतीनं अमली पदार्थांची अनिवार्य चाचणी करणं आवश्यक असतं.

इतर कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांची चाचणी नियुक्तीच्या वेळी किंवा विशिष्ट घटनांनंतर केली जाते. नियमित रँडम तपासणीव्यतिरिक्त, सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही घटनेनंतरही अशी चाचणी केली जाते. 4 ऑगस्ट रोजीच्या एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानाबाबतच्या घटनेतही असंच करण्यात आलं होतं.

4. चाचणी कशी केली जाते?

DGCA च्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या लघवीच्या नमुन्यांची सहा प्रकारच्या सायकोअॅक्टिव्ह पदार्थांच्या अस्तित्वासाठी तपासणी केली जाते. यामध्ये ॲम्फेटामाइन्ससारखे उत्तेजक पदार्थ, ओपिएट्स आणि त्यांचे मेटाबोलाइट्स, टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (गांजा/कॅनाबिस), कोकेन, बार्बिट्युरेट्स आणि बेंझोडायझेपाइन्स यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.

चाचणी होत असलेल्या पायलट किंवा इतर कर्मचाऱ्याच्या मूत्राचा नमुना दोन भागांमध्ये विभागला जातो आणि वेगवेगळ्या कंटेनरमध्ये सुरक्षितपणे साठवला जातो. चाचणी प्रक्रिया पहिल्या कंटेनरमधील नमुना वापरून केलेल्या तात्काळ प्राथमिक तपासणी चाचणीनं सुरू होते.

जर प्राथमिक चाचणीचा निकाल 'नॉन-निगेटीव्ह' असेल, म्हणजेच त्यात मनोविकारक पदार्थांची उपस्थिती आढळल्यास त्याची पुष्टी करण्यासाठी केलेल्या चाचणीचा निकाल येईपर्यंत पायलटला तात्काळ कर्तव्यावरून दूर केलं जातं.

दुसऱ्या पात्रात साठवलेला नमुना खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. तिथे अत्याधुनिक चाचणी उपकरणांचा वापर केला जातो. यासाठी 'गॅस क्रोमॅटोग्राफी/मास स्पेक्ट्रोमेट्री' किंवा 'लिक्विड क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री' या पद्धतींचा वापर करून चाचणी केली जाते.

CAR मध्ये नमूद केल्यानुसार, "जर 'नमुना अ'ची चाचणी 'नॉन-निगेटिव्ह' आली, तर 'नमुना ब' खात्रीशीर चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाईल. यासोबतच नमुना घेणारी व्यक्ती, संबंधित कर्मचारी (डोनर) आणि संबंधित संस्थेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असतील."

5. वैमानिकांना काय सल्ला दिला जातो?

माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्याच्या प्रकरणात घडल्याप्रमाणे, जर चाचणीचा निकाल सकारात्मक आला, तर संबंधित संस्थेच्या वैद्यकीय प्रमुखानं मेडिकल रिव्ह्यू ऑफिसरचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकारात्मक निकाल हा मादक पदार्थांच्या सेवनामुळे न येता, कायदेशीर वैद्यकीय उपचार किंवा इतर सामान्य स्त्रोतामुळे आला आहे का, हे ठरवणं, हा यामागचा उद्देश असतो. उदाहरणार्थ, कोडीन असलेलं वेदनाशामक घेतल्यानं अफूजन्य पदार्थांसाठीची चाचणी सकारात्मक येऊ शकते.

'एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया'नं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वैमानिकांनी स्वतःहून औषधं घेऊ नयेत. भारतात सर्दी, खोकला, ॲलर्जी आणि झोपेच्या समस्यांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांमध्ये अशा घटकांचा समावेश असू शकतो, ज्यांची तपासणी केली जाते.

एएलपीए इंडियानं वैमानिकांना असाही सल्ला दिला आहे की, कोणतेही नवीन औषधोपचार सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या संस्थेच्या वैद्यकीय प्रमुखांचा सल्ला घ्यावा, त्यांच्या सर्व औषधांविषयी अचूक तपशील द्यावा आणि औषधचिठ्ठी तसेच खरेदीच्या पावत्या जपून ठेवाव्यात, जेणेकरून तपासणीनंतर एमआरओकडून रिव्ह्यू करण्याची गरज भासल्यास त्या सादर करता येतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)