You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपचा बिहारमधला बालेकिल्लाच प्रशांत किशोर यांनी कसा जिंकला? 'ही' आहेत 5 कारणं
- Author, मोहम्मद शाहिद
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
बांकीपूर विधानसभा मतदारसंघासाठी 30 जुलै 2026 रोजी मतदान झाले. या निवडणुकीत 35 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले, त्यामुळे विविध प्रकारचे अंदाज आणि शक्यता व्यक्त करण्यात आल्या होत्या.
एकूण 32 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19 हजार 324 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना 64 हजार 151 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवाराला 44 हजार 827 मते मिळाली.
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करत लिहिले, "लोकशाहीच्या महापर्वात बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने जनसुराजची निवड केली आहे. जनतेच्या या निर्णयाचा मी आदर करतो आणि श्री. प्रशांत किशोर यांचे विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो."
पण बिहारच्या विधानसभा निवडणुकीवेळी फारशी चमकदार कामगिरी न दाखवता आलेल्या प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीत कशी बाजी मारली? आणि तेही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात? बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बिहारमधील बालेकिल्ला मानला जातो, तोच प्रशांत किशोर यांनी कसा जिंकला? बीबीसीनं राजकीय विश्लेषकांशी चर्चा करून याबाबत अधिक समजून घेतलं.
1) विद्यार्थ्यांचे आंदोलन
बांकीपूरमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच देशाची राजधानी दिल्ली येथे कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करत होती.
20 जुलै 2026 रोजी 'चलो संसद' मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेची प्रतिक्रिया देशभर उमटली. त्यानंतर 22, 23 आणि 25 जुलै रोजी बिहारसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
25 जुलै 2026 रोजी 'बिहार बंद'चे आवाहन करण्यात आले. सिवान जिल्ह्यातील आंदोलनादरम्यान एके-47 मधून गोळीबार झाल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला. याच काळात राज्यातील विविध भागांमधील अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.
पटण्यातील ज्येष्ठ पत्रकार लव कुमार मिश्रा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले की, सीजेपीच्या आंदोलनाचा या निवडणुकीवरही परिणाम झाला.
त्यांच्या मते, "दिल्लीतील आंदोलनानंतर बिहारच्या विविध भागांत निदर्शने झाली. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. जेपी आंदोलनानंतर प्रथमच विद्यार्थी राजभवन आणि मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पोहोचले. हा संपूर्ण परिसर बांकीपूर मतदारसंघात येतो."
ते पुढे म्हणाले, "दिल्लीतील आंदोलनाचा या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला."
ज्येष्ठ पत्रकार सुरूर अहमद यांनीही या मताशी सहमती दर्शवत सांगितले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन हा या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक होता.
2) भरत तिवारी यांचा कथित 'एन्काउंटर'मधील मृत्यू
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलौटी गावातील 26 वर्षीय भरत भूषण तिवारी यांचा 17 जून रोजी कथित पोलिस चकमकीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भोजपूरच्या पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते की, "पोलीस पथकाने स्वतःच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी भरत भूषण यांच्या पायाला लागली."
मात्र, भरत तिवारी यांच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला.
ज्येष्ठ पत्रकार लव कुमार मिश्रा यांच्या मते, या प्रकरणात न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली असली तरी बराच काळ कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, भरत यांच्या कुटुंबीयांनी पटणा येथे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली.
मिश्रा म्हणतात, "सम्राट चौधरी यांनी या प्रकरणात खूप उशिरा कारवाई केली. एसटीएफच्या एका जवानाला बराच उशिराने अटक करण्यात आली. तसेच भरत तिवारी यांच्या कुटुंबीयांनी प्रशांत किशोर यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण तसे झाले नाही. मात्र या घटनेने जनतेच्या भावना तीव्रपणे ढवळून निघाल्या."
3) भाजपमध्ये अंतर्गत मतभेद होते का?
बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला आणि त्यांच्या जागी नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली.
सुरूर अहमद आणि लव कुमार मिश्रा या दोघांच्याही मते, या जागेवर भाजपमधील अनेक वरिष्ठ नेते निवडणूक लढवू इच्छित होते, पण अखेरीस तुलनेने नवीन चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली.
सुरूर अहमद म्हणतात, "या मतदारसंघात कायस्थ समाजाची लक्षणीय मते आहेत. अजय आलोक यांसारखे नेतेही उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र भाजपने अचानक उमेदवार बदलला. त्याचवेळी एका भाजप नेत्याने 'या जागेवरून कोणताही उमेदवार जिंकू शकतो' असे वक्तव्य केले. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांना गृहीत धरले जात असल्याची भावना निर्माण झाली."
लव कुमार मिश्रा म्हणतात, "नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या नेत्यांनी या जागेसाठी पुरेशी मेहनत घेतली नाही, अशीही चर्चा होती. प्रशांत किशोर यांनी भाजपच्या या कमकुवत बाजूचा प्रभावीपणे फायदा घेतला."
4) जेडीयूची भूमिका आणि कमी मतदान किती निर्णायक ठरले?
नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर आघाडी सरकारमध्ये जनता दल (युनायटेड) अर्थात जेडीयूची भूमिका 'लहान भाऊ' अशी झाली आहे.
ज्येष्ठ पत्रकार लव कुमार मिश्रा यांच्या मते, निवडणूक प्रचारादरम्यान जेडीयूची उपस्थिती फारशी जाणवली नाही.
ते म्हणाले, "बांकीपूर पोटनिवडणुकीत जेडीयू प्रत्यक्ष मैदानात दिसली नाही. प्रचाराची संपूर्ण जबाबदारी भाजपवरच होती."
सुरूर अहमद यांच्या मते, 35 टक्क्यांपेक्षा कमी मतदान होणेही भाजपच्या विरोधात गेले. प्रचारादरम्यान उमेदवार बदलल्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला.
ते असा दावा करतात की, जर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात नसते, तर मतदानाची टक्केवारी 24 टक्क्यांपर्यंत घसरली असती.
5) सम्राट चौधरीच राहिले मुख्य लक्ष्य
निवडणूक प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी आपल्या भाषणांमध्ये सातत्याने मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरच निशाणा साधला.
सुरूर अहमद यांच्या मते, सम्राट चौधरी यांनी प्रशांत किशोर यांच्यावरील कायदेशीर प्रकरणांना प्रचाराचा मुद्दा बनवला, तर दुसरीकडे सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. मात्र बांकीपूर हा तुलनेने सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मतदारसंघ आहे.
ते म्हणाले, "या मतदारसंघात आमदार, खासदार, न्यायाधीश, वकील अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची घरे आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरी यांच्यावर सातत्याने टीका करण्याची रणनीती प्रभावी ठरली."
लव कुमार मिश्रा म्हणाले, "प्रशांत किशोर यांनी आपल्या भाषणांमध्ये नितीन नवीन किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा उल्लेख केला नाही. त्यांनी केवळ सम्राट चौधरी यांच्यावरच हल्लाबोल केला आणि त्यांना भ्रष्ट तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला."
प्रशांत किशोर यांच्या विजयाचे राजकीय महत्त्व
विश्लेषकांच्या मते, या पोटनिवडणुकीतील प्रशांत किशोर यांचा विजय हा केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे.
लव कुमार मिश्रा म्हणतात की, हा विजय प्रशांत किशोर यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत करण्यास मदत करू शकतो.
त्यांच्या मते, विरोधी पक्ष इच्छित असल्यास पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांना भाजपविरोधी प्रमुख प्रचारक म्हणून पुढे करू शकतात.
मिश्रा पुढे म्हणाले, "मतदानापूर्वी बिहार पोलिसांनी पहाटे दोन वाजता 64 जणांना अटक केली होती. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांविरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांच्या या विजयाचे परिणाम अनेक स्तरांवर दिसून येऊ शकतात."
सुरूर अहमद यांच्या मते, प्रशांत किशोर यांच्या विजयाचे दीर्घकालीन राजकीय परिणाम काय होतील हे काळच ठरवेल. मात्र भाजपसाठी हा निकाल निश्चितच मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)